Monday 31 July 2017

चॅलेंज (भाग १)


तिघंही ठरल्याप्रमाणे संध्याकाळी सहाला कॅफेत पोहोचले. “ही अवनी तर कधीच वेळेवर येणार नाही. मीरा फोन कर तिला, बघ किती वेळ आहे” शौनकने वैतागून म्हटलं. हात खांद्यान्मागे ताणून आळस देत तो पुढे म्हणाला, “I am knackered. घरी जाऊन झोपायचं मला.”

“कोणाला कापत होतास?” दिगंतने हसून विचारलं.

“कापायला वेळ लागत नाही रे, जोडायला वेळ लागतो” शौनकने उत्तर दिलं.

“अवनी अर्ध्या तासात पोहोचतेय. ट्रॅफिकमधे अडकलीये म्हणाली.” मीराने मोबाईल खाली ठेवत या दोघांना सांगितलं.

“हो ट्रॅफिक, आम्ही हेलिकॉप्टरने आलोय ना, ट्रॅफिक काय आजच आहे का, ते असेल असं धरूनच तेवढा वेळ आधी निघायला पाहिजे ना! काहीही कारणं देत असते!” शौनकच्या बोलण्यात त्याचा वैताग अगदी स्पष्ट होता.

“तू आज जास्तच थकलायस का? मेसेज करायचा होतास, आपण पोस्पोन केलं असतं.” मीराने काळजीच्या सुरात त्याला म्हटलं.  

“च्.... आपलं ठरलं आहे ना, महिन्याचा शेवटचा शनिवार, Rule is rule!” शौनक निग्रहाने म्हणाला. दिगंतकडे वळून त्याने पुढे विचारलं, “काय रे, या वेळी चलेंज तू देणार आहेस ना? ठरवलयस ना?”

“हो तर, अवनीला येऊ दे, मग सांगतो”

ज्युनिअर कॉलेजला भेटलेल्या या चौघांची मैत्री इतक्या वर्षांनीही टिकली होती. कॉलेजनंतर चौघांच्या वाटा पूर्ण वेगळ्या झाल्या. जात्याच सुंदर, चटपटीत, मोकळ्या स्वभावाची, मॉडर्न अशी अवनी, आयटी इन्जीनीअर म्हणून मल्टीनॅशनल कंपनीमधे लागली. तिच्या मानाने मीरा तशी साधी, पण आश्वासक हसरा चेहरा, मधाळ डोळे आणि शांत स्वभाव यामुळे कोणालाही चटकन आवडण्यासारखी. ती एका प्रायव्हेट शाळेत शिक्षिका होती. उंचपुरा, दणकट, आणि चेहर्यावर कुशाग्र बुद्धीमत्तेचं, आत्मविश्वासाचं तेज असा शौनक, MBBS होऊन आता सर्जरीचं प्रशिक्षण घेत होता. आणि दिगंत.... मध्यम बांधा, रेखीव चेहरा, भावूक डोळे, पाहणार्याला कवी वाटावा असा दिगंत फिलॉसॉफीमधे पी एच डी करत होता. स्वभाव आणि क्षेत्र पूर्ण वेगळी असली तरी कशी कोण जाणे यांची मैत्री घट्ट टिकून होती. दोन जणांमध्ये नक्की काय क्लिक होतं तेव्हा सूर जुळतात हे सांगणं तसं कठीणच ना! एकाच शहरात असल्याने भेटीगाठी होणं कठीण नव्हतं.

त्यात गेल्या दोन वर्षांपासून या चौघांनी एक नवीन पद्धत सुरू केली होती. ‘4 वीक्स चॅलेंज’. दर महिन्याला एकाने काहीतरी चॅलेंज द्यायचं आणि चौघांनीही ते चार आठवडे पाळायचं. दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी भेटायचं, गप्पाटप्पा, कॉफी आणि चॅलेंज बद्दलचे आपले अनुभव शेअर करायचे. कधी तोंडी, कधी लिहून. आणि त्याच दिवशी पुढच्याने नवीन चॅलेंज द्यायचं. चौघानांही हा खेळ आता चांगलाच आवडू लागला होता.   

अवनी आली तेव्हा त्या तिघांनीही आपापले गेल्या महिन्याच्या चॅलेंजचे पेपर्स काढले होते. “मी दिलेलं चॅलेंज, रोज दहा हजार स्टेप्स चालायचं. मी मोबाईलच्या अॅप वरून रेकॉर्ड ठेवत होतो. जेजेचं कॅम्पस इतकं मोठं आहे की क्लिनिक, वॉर्ड, आणि ओपरेशन थीएटरच्या चकरांमधेच सात आठ हजार स्टेप्स होऊन जात होत्या. अजून थोडसं चाललं की झालं.” म्हणत त्याने त्याचा कागद पुढे सरकवला. त्यावर तारखा आणि आकडे होते. एकाही दिवशी आकडा दहा हजारांच्या खाली नव्हता. मग मीरा, मीराची अबोली फुलांची डायरी एव्हाना सगळ्यांच्या ओळखीची झाली होती. तिनेसुद्धा दिवसवार नोंद केली होती पण आकड्यांबरोबर अजून छोट्या छोट्या नोंदी होत्या. डायरी पुढे सरकवून ती बोलू लागली, “मी रोज शाळेत चालत जायला आणि यायला सुरुवात केली. येताना कधी कधी फार थकायला व्हायचं पण सकाळी चालून खूप फ्रेश वाटायला लागलं. आता चॅलेंज संपलं तरी सकाळी चालत जाण्याचा नियम तसाच ठेवणार आहे. माझं वजनही दोन किलो कमी झालं” तिने हसत म्हटलं.

“See.......” शौनकने स्वतःची कॉलर टाईट केली.

दिगंतने त्याची वही उघडली आणि तो बोलू लागला. “मीसुद्धा रोज रात्री एक तास चालायला सुरुवात केली, पीडोमीटर घेऊन. म्हटलं मोबाईल घेऊन जायचं नाही नाहीतर पुन्हा तोच बघत बसणं होईल. I must say, मला खूप फायदा झाला. एक तास फक्त आपण आणि आपले विचार. साठलेला गुंता शांतपणे सोडवावा तसं या एक तासाच्या शांत विचारांमुळे माझ्या मनातला कितीतरी गुंता सुटल्यासारखा वाटतोय. खूप हलकं वाटतंय , शरीराने तर आहेच पण मनानेसुद्धा, थँक्स मित्रा” म्हणत त्याने शौनकच्या पाठीवर थाप दिली. शेवटचा मेंबर अवनी, ती बोलू लागली “मी तर रोज जिमला जातेच. धावलं तर स्टेप्स जास्त होतात म्हणून मी ट्रेडमिलवर रोज धावत होते. हिअर......” म्हणत तिने तिचा Excel sheet चा प्रिंट आउट पुढे सरकवला आणि विचारलं, “आज चॅलेंज कोण देतंय?”

“मी” दिगंत म्हणाला. “पण हे चॅलेंज वेगळं असणार आहे. Nothing physical. चॅलेंज हे आहे की पुढच्या चार आठवड्यांत आपण एकदाही खोटं बोलायचं नाहीये, अगदी अजिबात नाही. आणि जेव्हा जेव्हा खोटं बोलायची वेळ येईल आणि आपण ते न बोलता खरंच बोलू तो incident, त्याचा परिणाम, आपले विचार हे सगळं नोट करून ठेवायचं” उरलेले तिघेही गोंधळले होते. “पण दिगंत, आपण कुठे उठसूठ खोटं बोलत असतो?” मीराने विचारलं. “ते आता कळेलच” दिगंत हसून म्हणाला, “कबूल आहे की आपण काही हवाला घोटाळा करत नाही. पण येता जाता लहान सहान थापा मी तरी मारतो, जसं फोन उचलायचा नसला की मी मिटींगमधे होतो, कोणाकडे जायचं नसलं की नेमका मी मुंबईत नाहीये त्या दिवशी, किंवा लेटेस्ट म्हणजे मुलगी पसंत नसली की कळवायचं की पत्रिका जुळत नाहीये. किंवा आपल्या अवनीसारखं, निघायचं उशिरा आणि सांगायचं की ट्रॅफिक होतं....” अवनीसकट सगळेच हसू लागले. “हो रे, निघायलाच थोडा उशीर झाला पण खरंच थोडं ट्रॅफिकसुद्धा होतं” अवनीने हसत म्हटलं, “तुम्ही सगळे मस्त कॉफी घेऊन बसलायत. मी ऑर्डर देऊन येते” म्हणत ती टेबलकडून उठली.

“दिगंत, मग आता तू मुलगी बघायला गेलास आणि तुला नाही आवडली की तू सरळ सांगणार की तुमची मुलगी फोटोतल्यासारखी मस्त दिसत नाहीये. म्हणून माझा नकार आहे?” शौनकने दिगंतला चिडवायला विचारलं. “पहिलं म्हणजे मी फक्त दिसण्यावरून मुलीला नकार देईन असं होणारच नाही. मी नकाराचं खरं कारण सांगेन की माझ्यां बायकोबद्दलच्या अपेक्षा वेगळ्या आहेत. तुमची मुलगी ही त्या अपेक्षांमध्ये बसत नाहीये एवढंच” मीराने मधेच त्याला थांबवत विचारलं, “पण अशा कटू सत्याने काय होणार दिगंत? म्हटलंच आहे ना, प्रियं ब्रूयात्, सत्यम् ब्रूयात्, न ब्रूयात् अप्रियम् सत्यम्”*. दिगंतने उत्तर द्यायच्या आधीच शौनकने मीराला विचारलं “कोणी म्हटलंय हे? कृष्णाने का? मीरा, तुझं फक्त नाव मीरा आहे, तू त्या कृष्णाची मीराबाई नाहीयेस”

“मग कोणाची मीरा आहे ती?” दिगंतने कोपरखळी मारली. मीरा गोरीमोरी झाली. इतक्यात अवनी तिचा कॉफीचा कप घेऊन टेबलकडे परतली. “काय अवनी, रोहन काय म्हणतो? कसं चाललंय तुमचं?” शौनकने सोयीस्करपणे विषय बदलला. रोहन हा अवनीचा boyfriend होता. वर्षभर ते एकमेकांना ओळखत होते. प्रकरण मैत्रीच्या पुढे होतं पण घरच्यांशी ओळख करून देण्याइतपत अजून नव्हतं. “रोहन बराय, इथून मी त्यालाच भेटायला जातेय. नंतर एका पार्टीला जायचंय” कॉफीचा घोट घेत तिने म्हटलं. “दर शनिवारी अश्या पार्ट्या आणि जागरणाचा तुला कंटाळा नाही येत?” दिगंतने उत्सुकतेने तिला विचारलं. “येतो ना, शनिवारी रात्री क्लबिंग, पार्टीज म्हणजे भरपूर जागरण. मग रविवारी सकाळी लवकर जाग येत नाही आणि रात्री वेळेवर झोप येत नाही. म्हणजे पुन्हा सोमवारी सकाळी उठायला उशीर. मग जॉबला लेट, मग थापा माराव्या लागतात.” अवनीने एका दमात सांगितलं. “अगं पण मग नाही म्हणायचं ना जायला. रोहनला खूप आवड आहे का या सगळ्याची?” मीराने विचारलं. “रोहनला सवय आहे पण फार काही आवड आहे असं नाही. थोडी फार आवड म्हटली तर मलाच. पण तीही आता कमी होतेय. पण न जावं तर आपल्या हातून काहीतरी निसटतंय असं वाटतं. आमचा बॉम्बे स्कॉटिशचा सगळा ग्रूप नेहेमी भेटत असतो. चार वेळा नाही म्हटलं तर पाचव्या वेळी आपल्याला बोलावणारच नाहीत अशी काहीतरी विचित्र इनसिक्युरिटी वाटते मला.” दिगंतकडे वळून तिने विचारलं, “दिगंत हे चॅलेंज खरं ‘बोलण्यापुरतं’च आहे की texting, facebook वगैरे सगळ्यालाच? म्हणजे फोटो आवडला नसेल तर like सुद्धा करायचा नाही का?” अवनीने काळजीने विचारलं. दिगंत खो खो हसू लागला आणि म्हणाला, “Ideally yes, सत्य किंवा honesty म्हणजे तोंडाने सत्य बोलणं ही पहिली पायरी आणि ‘ऋत’ किंवा authenticity म्हणजे प्रत्येक गोष्ट अंतर्मनाशी प्रामाणिक राहून करणं ही पुढची पायरी. आपल्याला किती जमतंय बघूया. आणि मी दिलेलं चॅलेंज आहे म्हणून मी एक टिप देतो. खरं बोलणं शक्य नसेल तेव्हा ‘मौनम् सर्वार्थ साधनम्’”

शौनकने जोरजोरात मान हलवत अवनीला म्हटलं “या दोघांनी चोरून संस्कृतच्या ट्युशन्स लावल्यायत.” “No way.....” म्हणत अवनीने आश्चर्याने मीराकडे पाहिलं आणि प्रश्नार्थक चेहऱ्याने “हो?” असं विचारलं. “चल् गं. त्याच्या बोलण्यावर काय जातेस! शौनक, नशीब चॅलेंज उद्यापासून सुरू होतंय नाहीतर तुझ्या या बोलण्यामुळे आजच हरला असतास तू!” मीराने शौनकला तंबी दिली. पुढे नेहेमीप्रमाणे गप्पा छान रंगल्या. निघायची वेळ झाली. “मीरा मी त्याच बाजूला चाललोय. तुला बाईकवर ड्रॉप करू?” शौनकने निघता निघता विचारलं. “काय रे तू नेहेमी बरोबर त्याच बाजूला कसा जात असतोस! कधी आमच्या बाजूला सुद्धा येत जा” दिगंत शौनकला चिडवायची एकही संधी सोडत नसे. “शौनक खरंच मला हायवे पर्यंत सोड ना. मला रोहनला भेटायला उशीर होतोय, if Meera doesn’t mind ofcourse...” अवनीने स्वतःचं घोडं पुढे दामटलं. शौनकने हसत हसत कपाळावर हात मारला. “तुम्ही निघा. मला बाजूच्या बुक स्टोअर मधे जायचय” मीराने त्यांचा निरोप घेतला. सगळे आपापल्या दिशांना निघाले पण प्रत्येकाच्या मनात चुटपूट होती की कसे होणार आहेत हे सत्याचे प्रयोग!          



डॉ. माधुरी ठाकुर


* लोकाना आवडेल प्रिय वाटेल असं बोलावं, सत्य बोलावं, पण जे सत्य कटू असेल (अप्रिय) ते बोलणं टाळावं

 












  









  

  

























  












Wednesday 12 July 2017

लॉटरी

 

लिफ्टमधून बाहेर पडेपर्यंत तिच्या हातावरची त्याची पकड घट्ट झाली होती. तिचं काळीज धडधडू लागलं. घरी गेल्यावर आपली धडगत नाही हे तिला कळलं होतं. “मी खरच कधीच बोलले नाही तिच्याशी. लिफ्टमधे तिने hi केलं तेव्हा मी फक्त हसले” घरात शिरल्या शिरल्या तिने घाबरून सांगितलं. “खरंच?” संजयने उपहासाने विचारलं. तू क्वीन एलिझाबेथ आहेस ना! की तू बोलत नाहीस आणि लोकंच आपण होऊन तुझ्याशी बोलायला येतात.... इतकं, इतकं कठीण आहे एक सांगितलेली गोष्ट पाळणं? लोकांशी बोलू नको, बोलू नको कित्ती वेळा सांगितलंय!” चिडून तिच्या अंगावर ओरडत तो पुढे सरकला. तिच्या केसांना हिसका देऊन त्याने तिचं डोकं, केसांना धरून घट्ट पकडलं. “परत कोणाशी बोलताना दिसलीस तर तुला सोडणार नाही मी.” हिस्र श्वापदाच्या तावडीत सापडलेल्या हरणासारखी कांचन थरथरू लागली. तिचं ते घाबरण बघून खुनशी हसत त्याने तिला जमिनीवर ढकलून दिलं. तिला तसं लोटून तो दार लावून एकटा घराबाहेर निघून गेला.
     या महिन्यातली त्याच्या आक्रस्ताळेपणाची ही चवथी वेळ होती. तिच्या हातावरचे सिगरेटच्या चटक्यांचे डाग अजून फिकेही झाले नव्हते. कांचन कपड्यांनी अंगावरचे ठिकठिकाणचे वळ झाकत असे. झाकायचेही कोणापासून म्हणा! एकटीने बाहेर जायला तर तिला मज्जावच होता. संजय कामाला जाताना बाहेरून दार लॉक करत असे. भाजीपाला, किराणामाल आणायला तो तिच्या सोबत जात असे. कांचनच्या मनात विचार आला, लग्नाची बेडी आपल्यासाठी खरोखरीची बेडीच आहे. कोणत्या चुकीची शिक्षा भोगतोय आपण? आईवडलांनी ठरवलेल्या ठिकाणी लग्न करायला मुकाट्याने हो म्हटलं, लांब अनोळखी माणसाबरोबर लग्न नको असा विरोध नाही केला या चुकीची की आपले आईवडील भोळे आहेत, संजयची काही चौकशी न करताच त्यांनी विश्वास ठेवला या चुकीची! काय म्हणायचे बाबा नेहेमी “तो परमेश्वर नेहेमी वरून आपल्याला बघत असतो. लक्ष ठेवत असतो, काळजी घेत असतो.....” तिने मान वर करून बघितलं. वर घराच्या पांढर्या छताशिवाय काहीच दिसलं नाही. तिची नजर खिडकीकडे गेली. पंधराव्या मजल्यावरून खालचा रस्ता, त्यावरच्या गाडया खेळण्यांसारख्या दिसत होत्या. ‘नाही हो बाबा तो नाहीये वर. आणि असलाच तर त्याचं लक्षच नाहीये माझ्याकडे. त्याचं आकाश फार दूर आहे माझ्यापासून आणि माझी जमीनही सुटली.’ तिच्या गालांवरून आसवं वाहू लागली. पण पुसणारं कोणीच नव्हतं.
      महाराष्ट्राच्या नकाशावरही नसलेल्या छोट्याश्या गावात कांचन लहानाची मोठी झाली. वडिलोपार्जित जमिनीचा छोटासा तुकडा, त्यावर पिकवून त्यांचं कसंबसं चाले. गरिबी तिच्या घराच्या पाचवीलाच पुजलेली होती. पण तिचे आईवडील आहे त्यात संतुष्ट असत. चटणी भाकरी खाऊन आला दिवस साजरा करत. त्यांच्या गावात डांबरी रस्ता बांधण्याचं काम सुरु झालं. कंत्राटदार गावात आला. त्याने संजयचं स्थळ तिच्या वडलांना सांगितलं.  ‘फॉरेन’चा मुलगा ! नाते वाईक वगैरे काहीच लटांबर नाही. तुमची मुलगी राणी होईल, त्याने तिच्या वडलांना स्वप्नं रंगवून दाखवलं. आणि एरवी कदाचित ते इतक्या चटकन फसलेही नसते पण तो फकीर..... किती वर्षांपूर्वीची गोष्ट असेल ती.......
      कडक उन्हाळ्यातली ती दुपार होती. कांचन, आई, वडील आणि दोन बहिणींबरोबर जेवायला बसली होती. इतक्यात दारातून आवाज आला. “क्या भूखे फकीर को थोडा खाना मिलेगा?” वडलांनी त्यांच्या ताटातल्या एका भाकरीचे दोन तुकडे केले, एक तुकडा आणि त्यावर चटणी, हातांत घेऊन ते दारापाशी आले. वडलांच्या मागे शेपटासारखी तीसुद्धा दाराकडे आली. तिच्या वडलांनी फकिराला ती भाकरी दिली आणि विचारलं, “पानी चाहिये बाबा?” फकिराने मान डोलावली. “कांचन, बाबांना पाणी आण” त्यांनी कांचनला सांगितलं. कांचन आत जायला वळणार तोच त्या फकिराने तिच्याकडे बोट करून तिच्या वडलांना विचारलं, “आपकी बेटी है?” वडलांनी हो म्हणून मान हलवली. तिच्या चेहर्याकडे निरखून बघत फकीर म्हणाला, “इसकी तो लॉटरी आनेवाली है, बहुत पैसा आएगा, बहुत पैसा !!” कांचन तिथेच थबकली. तिच्या वडलांनाही हे अगदीच अनपेक्षित होतं. “आप ज्योतिष जानते हो बाबा?” त्यांनी फकिराला विचारलं. आणि लगेच तिला म्हणाले, “कांचन पाया पड त्यांच्या” आपण पाया पडलो तेव्हा काय बरं म्हणाला तो फकीर, अर्थही नीटसा कळला नव्हता....  
      त्या दिवसापासून बाबांना मात्र खरंच वाटायला लागलं की लॉटरी लागणार आहे. दर वेळी तालुक्याच्या गावी गेले की ते कांचनच्या हाताने एक लॉटरीचं तिकीट घेत. पण कधी बक्षीस लागलं नाही. संजयचं हे फॉरेनचं स्थळ आलं तेव्हा ते खूष होऊन ज्याला त्याला सांगायचे “बघा तो फकीर म्हणाला होता ती लॉटरी हीच. आमच्या सात पिढ्यांत कोणी मुंबईसुद्धा बघितली नाही. आणि आता आमची कांचन फॉरेनला जाणार. लॉटरी नाहीतर काय म्हणायचं याला ! नक्की हीच ती लॉटरी होती आणि मी वेड्यासारखा तिकीटं घेत बसलो”
      “ही लॉटरी?” हातावरच्या वळांवरून अलगद दुसरा हात फिरवून तिने स्वतःला विचारलं. बाबा कसे हो तुम्ही एवढे भोळे. तो फकीर वेडा, की मला एवढं लांब असं पाठवून देणारे तुम्ही वेडे, की काहीही कारण नसताना माझा असा छळ करणारा हा माझा नवरा वेडा, की हे सगळं चुपचाप सहन करणारी मी वेडी....
      बर्याच उशिरापर्यंत संजय आला नाही तेव्हा कांचन झोपून गेली. रात्री बर्याच वेळाने, चावीने दार उघडल्याचा आवाज आला. त्याचबरोबर दारूचा उग्र दर्प. संजय लडखडत खोलीत आला. देवा, आज नको...... आज नको..... कांचनने मनात देवाचा धावा सुरु केला. ती झोपल्याचं नाटक करून अंग चोरून तशीच पडून राहिली. तिच्या सुदैवाने तो बिछान्यात पडला आणि पुढच्याच क्षणाला घोरू लागला. तिची झोप मात्र मोडली ती मोडलीच. जुन्या गोष्टी तिला आठवू लागल्या. तिचं लग्नं ठरलं तेव्हा डॉक्टरकाका आणि प्रमिलाताई तिच्या घरी आले होते. हे पतीपत्नी म्हणजे सीतारामाची जोडी होती. ते गावात धर्मदाय दवाखाना चालवत. शिवाय गावात शिक्षणाबद्दल जागरूकता आणण्यासाठीही काहीनाकाही करत असत. प्रमिलाताई घरोघरी जाऊन बायकांशी बोलायच्या. त्यांना आहार, आरोग्य, स्वच्छता, कुटुंबनियोजन सगळ्याबद्दल नीट समजावून सांगायच्या. गावातली एक अनाथ मुलगी यांनी दत्तक घेतली होती. तर डॉक्टरकाका बाबांना सांगत होते, “तुम्ही मुलाची अजून माहिती काढायला हवी. त्याशिवायच कांचनला असं पाठवायचं म्हणजे..... त्यात तिला इंग्रजीही फारसं येत नाही. देव न करो पण तिला मदत लागली तर परक्या देशात ती कसं काय करणार?” “आपले कॉन्ट्रॅक्टर मिश्रा त्यांना ओळखतात ना. आणि आम्ही गरीब माणसं, परदेशात चौकशी करायला आमचं तिथे आहे कोण ! आज कांचन गेली तर उद्या पुढच्या पिढीचं सोनं होईल.....” बाबांनी त्यांचं ऐकलं असतं तर..... पण परदेशाच्या लॉटरीने त्यांना आंधळं केलं होतं.
     अंधारात चकाकणारे घड्याळाचे काटे बारा वाजल्याच दाखवत होते पण कांचनला झोप कशी ती नव्हती. कुठूनतरी विचित्र वास येत होता, ती उठून स्वयंपाकघरात गेली. तिथे सगळं ठीक होतं. वास कुठून येतोय कळेना. तिने खिडकीतून खाली बघितलं. रस्त्यावर बरीच गर्दी होती. लोक हातवारे करून काही सांगत होते पण काही ऐकू येत नव्हतं. घराचं दार उघडून बघावं का काय झालंय. पण तिची हिम्मत होईना. घाबरत, दबकत तिने हॉलची खिडकी थोडीशी उघडून ऐकण्याचा प्रयत्न केला. आता किंचाळ्याचे आवाज यायला लागले होते. फायर फायर.... म्हणून लोकांच्या ओरडण्याचे आवाज येत होते. ती पुरी गोंधळली. काय करावं, काय करावं, जळका वास वाढला होता. फार विचार करायला वेळ नव्हता. ती बेडरूम कडे वळली. संजय अजूनही घोरत होता. आजूबाजूच्या गोंधळाचा त्याला पत्ताच नव्हता. त्याला उठवायला तिने हात पुढे केला तशी तिच्या कुडत्याची बाही जराशी वर सरकली. त्याने दिलेला सिगरेटचा चटका त्या मंद प्रकाशातही दिसत होता. तिने एक वार आपल्या हातावरच्या वळांकडे पाहिलं, आणि मग झोपलेल्या संजयकडे. एक क्षण विचार करून ती उलट्या पावली मागे फिरली. बेडरूमचं दार तिने लावून घेतलं, आणि निघणार इतक्यात ती पुन्हा वळली, नुसतं आड असलेलं दार तिने घट्ट लावून घेतलं आणि त्याला बाहेरून कडी लावली. बंद दाराच्या या बाजूला असण्याची तिची ही पहिलीच वेळ होती.
    संजय कामाची कागदपत्रं बाहेरच्या कपाटातल्या कप्प्यात ठेवायचा हे तिने पाहिलं होत, तिने तो कप्पा उघडला, त्यात तिचा पासपोर्ट समोरच होता तो उचलला आणि ती घराबाहेर जिन्याकडे धावत सुटली. किंचाळ्या, आरडाओरडा, रडणं, कुंथण कसकसले आवाज येत होते पण ती पळत सुटली. आपण आगीपासून पळतोय की संजयपासून.... कुठे जायचं, कसं जायचं, पण पहिल्यांदी या इमारतीतून बाहेर पडायला हवं. मग पुन्हा भारतात जाऊ. आई बाबांकडे. ते कधीच आपल्याला टाकणार नाहीत. आपण निघतानाही ते आपल्याला म्हणाले होते “हे घर नेहेमी तुझंच आहे. काही काळजी करू नकोस, ‘तो’ वरून बघतो आहे, ‘तो’ सगळी काळजी घेईल.” एव्हाना ती तीन माजले खाली आली होती. ‘तो’ वरून बघतो आहे.... ‘तो’ वरून बघतो आहे.... म्हणजे मी आत्ता संजयला वर कोंडून आले तेसुद्धा त्याने बघितलं का? त्याला खरच सगळं दिसतं का? मग माझे हाल होतात तेव्हा?.... तो काहीच कसा करत नाही.... धूर वाढत होता, तिच्या नाकातोंडात धूर जात होता, तिला काही कळेनासं झालं..... फक्त वडलांचं “’तो’ बघतो आहे..... ‘तो’ बघतो आहे.....” वाक्य तिच्या डोक्यात ठाण ठाण वाजू लागलं. असह्य हौऊन तिने दोन्ही हातानी कान दाबले आणि ती उलट पुन्हा वर तिच्या फ्लॅटच्या दिशेने धावू लागली. पळत पळत ती घरात आली. बाहेरचा दरवाजा तिने उघडाच टाकला होता. ती धावत बेडरूमकडे गेली. आतून संजय जोरजोरात ओरडत होता. “दार उघड हरामखोर...... दार उघड, मरेन मी......” तिने कडी काढली त्याबरोबर तो पिसाळलेल्या जनावरासारखा बाहेर आला. बाहेर येऊन खाडकन त्याने तिच्या गालवर जोरदार थप्पड दिली आणि तो दरवाज्याकडे धावला. ती त्याच्या मागे. आता धूर चांगलाच वाढला होता, ते जिन्याच्या दिशेने निघाले एवढ्यात अग्निशमन दलाचा एक फायर फायटर वर आला. त्याने संजयला सांगितलं की आगीने जिन्याचा रस्ता बंद झाला होता, फायर एस्केप (आपत्कालीन मार्ग) म्हणून बिल्डींगच्या मागच्या बाजूला शिडीसारख्या पायर्या होत्या त्यावरून खाली जावं लागणार होतं. ते तिघे बिल्डींगच्या मागच्या बाजूच्या शिड्यांवरून खाली जाऊ लागले. पुढे तो फायर फायटर , मधे ती आणि मागे संजय. आग आता चांगलीच पसरली होती. इमारतीत ठिकठिकाणी आगीने पेट घेतला होता. इथल्या घरांच्या बांधकामात लाकूड खूप वापरतात त्यामुळे आगीचा धोका असतो हे कांचनने ऐकलं होतं पण त्याचं एवढं रौद्र रूप बघायची वेळ येईल असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं. आता ते दहाव्या मजल्यापर्यंत पोहोचले होते. संजय अजूनही खवळलेलाच होता. “मला कोंडून काय पळून चालली होतीस, you...xxxxx” असं म्हणून त्याने पुढे शिडी उतरणार्या कांचनला एक सणसणीत लाथ मारली. कांचन भेलकांडत पुढे असणार्या फायर फायटर वर जाऊन आदळली. त्या दोघांनीही दचकून मागे पाहिलं. इतक्यात वरच्या मजल्यावरून आगीने पेटलेला एक मोठा लाकडी खांब खाली कोसळला आणि त्यांच्या डोळ्यांसमोरच संजयच्या अंगावर पडून त्याच्यासकट खाली गेला.
     कांचन दवाखान्यात प्रमिलाताईच्या समोर बसली होती. तिच्या हातात एक लिफाफा होता बाहेरून आलेला. तिने तो ताईपुढे केला. “हे काय आहे?” त्यांनी विचारलं. “लॉटरी.... संजयच्या कंपनीने त्यांच्या सगळ्या लोकांचा विमा काढला होता. एक लाख पौंडांचा चेक आलाय माझ्या नावाने. आगीत खूप जणं गेली, सगळ्यांच्या बॉडी सापडल्या नाहीत, ओळखता आल्या नाहीत. पण संजयची बॉडी सापडली आणि फायर फायटरने साक्ष दिली म्हणून माझा चेक लवकर आला.” प्रमिलाताईनी कांचनच्या हातावर थोपटलं. “कांचन, तू खूप हिंमतीची आहेस. ह्या पैशांसाठी तालुक्याच्या बँकेत खातं उघडून देऊ तुला?” “नाही ताई, एवढ्या पैशांची आम्हांला गरजच नाही. आईबाबांना म्हातारपणासाठी पुरतील एवढे पैसे ठेवीन मी पण बाकी सगळे पैसे चांगल्या कामाला वापरले जाऊदेत. बाबासुद्धा हो म्हणालेत. तुम्ही सांगा कसं करायचं ते” प्रमिलाताई अवाक झाल्या. त्या म्हणाल्या, “हे बघ बाळा, आत्ता, तुला धक्का बसलाय. अशा वेळी मोठे निर्णय न घेणं चांगलं. थोडा वेळ जाऊदे. मग शांत चित्ताने ठरव.”
“शांत?.... शांत कधी वाटणार मला ताई? झोप लागत नाही, लागली तरी कधी मला मारणारा, छळ करणारा संजय डोळ्यांसमोर येतो. कधी आग डोळ्यांसमोर येते, ती जळकी प्रेतं, ते कळवळणारे, रडणारे लोक डोळ्यांसमोर येतात. आगीने पेटलेला, दहाव्या मजल्यावरून खाली पडणारा संजय डोळ्यासमोर येतो आणि आठवतं की मी त्याला तिथे जळून जायला कडी लावून जाणार होते” कांचन उद्रेकाने थरथरत होती. “पण माझी चूक नाहीये, ‘तो’ वरून बघत होता, मी कडी काढली, मी कडी काढली.....” ती हमसाहमशी रडू लागली. “तुझी चूक नाहीये बाळा, तुझी चूक नाहीये, उलट तू किती भोगलयस.” प्रमिलाताई हळवं होऊन म्हणाल्या.
“मग आता संपूदे ताई. मला शांती मिळू दे. तुम्ही माणसांपासून प्राण्यांपर्यंत सगळ्या गावाची काळजी घेता. तुमच्या कामात मला देव दिसतो. माहितीये ताई, त्या फकिराला पाया पडले तेव्हा तो मला काय म्हणाला होता...”
“ते लॉटरीचं?”
“हो लॉटरीचं, पण नंतर अगदी हलक्या आवजात त्याने मला सांगितलं लॉटरी तो लगेगी, बहोत पैसा मिलेगा, लेकीन बेटा सुकून पैसेसे नही, इबादत से मिलेगा”  
 (* इबादत = उपासना)

डॉ. माधुरी ठाकुर  


Monday 3 July 2017

तळ्याकाठी

तळ्याकाठी
“तू तर नेहेमी त्याचीच बाजू घेणार. तुला सांगण्याचाही काय उपयोग ! तरी तुला बजावतोय मी, माझ्या करीअरमधे तो ढवळाढवळ करतो तेवढी पुरे, पण आता माझ्या पर्सनल लाईफमध्ये जर त्याने नाक खुपसलं तर मोठा भाऊबिऊ सगळं मी विसरून जाईन.” त्याने आईला निक्षून सांगितलं.
“अरे पण चिंटू,” आई समजावणीच्या स्वरात सांगू लागली. “चिंटू म्हणू नको मला, हजारदा सांगितलाय, राजस म्हण. ओजसला कसं बरोबर ओजस म्हणतेस. मी काय आयुष्यभर चिंटूच रहायचं का?” राजसने चवताळून विचारलं.
“बरं, बरं, चुकलंच माझं! पण राजस, दादा नव्हता गेला त्यांच्याकडे. तुझ्या मैत्रिणीचे वडीलच येऊन बोलले त्याच्याशी, तुझ्याबद्दल. ते विचारत होते की तूसुद्धा दादाला जॉईन होणार आहेस का म्हणून. सगळे तुझ्या चांगल्याचाच विचार करतायत. ओजस तुला मदतच करतोय. तुला कळत कसं नाही!”
       “आई, तुला कसं कळत नाही की मला सतत त्याच्या हाताखाली, त्याच्या छायेत नाही रहायचंय. मला नकोय त्याची मदत. माहितीये तो खूप मोठाय आणि तुला केवढा अभिमान आहे त्याचा. आणि मी हा असा. पण तरीही मला त्याची मदत नकोय, तो नकोय आणि तूही नकोयस” तिरमिरीत दार धाडकन आपटून राजस घराबाहेर पडला. त्याने बाईक स्टार्ट केली. दोनतीनदा किक मारली पण ती स्टार्ट होईना. वैतागून त्याने बाईकला एक लाथ मारली. “तूसुद्धा त्यांच्यासारखीच! दादाने किक मारली की बरोबर स्टार्ट होशील” असं म्हणत चिडून त्याने जोरात परत एक किक दिली. नशिबाने या वेळी ती स्टार्ट झाली. तो भन्नाट वेगाने निघाला. दिशा नव्हती, कुठे जायचं ठरवलं नव्हतं. फक्त इथून लांब... खूप लांब... तो जातच राहिला.
      शहरापासून तो बराच लांब आला होता. मधेच भलतच वळण घेतलं बहुतेक कारण डांबरी रस्ता संपून आता कच्चा रस्ता लागला होता आणि आजूबाजूला गर्द झाडी. आपण कुठे आलो कुणास ठाऊक, एवढं लांब असं जंगलात यायला नको होतं असा विचार त्याच्या मनाला चाटून गेला. हः घाबरण्यासारखं काय आहे, वाघ सिंह आजकाल असतात कुठे! खरी भीती तर माणसांचीच आहे. लोकांपासून दूर असलं तर काय घाबरायचं. उलटसुलट विचार करत तो थकून थांबला. हेल्मेट काढलं. बाईक उभी करून तो आसपास पाहू लागला. थोड्याच अंतरावर मोठमोठ्या वृक्षांनी लपवून ठेवल्यासारखं एक छानसं तळ होतं. मस्त पिकनिक स्पॉट आहे की हा! मुग्धाला घेऊन इथे यायला हवं. राजसच्या मनात विचार आला. पण लगेचच आपल्या भावाकडे गेलेले मुग्धाचे बाबा त्याच्या डोळ्यासमोर आले. “म्हणे मी दादाला जॉईन करणार आहे का! नाही केलं तर काय मुलगी देणार नाही का मला! मी काय कमी आहे का? वेळ तर द्या मला सेटल व्हायला. घाई काय आहे एव्हढी... मुग्धाने त्यांना दादाकडे जाऊच कसं दिलं. सांगायचं ना नका जाऊ म्हणून. घाबरट आहे नुसती!”
     मुग्धाचे विचार झटकून तो तळ्याकडे गेला. तळ्याच्या पाण्यात हातपाय धुऊन फ्रेश होऊन तो परत बाईक कडे आला. हेल्मेट घालत त्याने बाईकला किक मारली. पुन्हा तेच. बाईक स्टार्ट होईना. त्याने खिशातून मोबाईल काढला पण नेटवर्क नव्हतं. सगळ्या जगाने आपल्या विरुद्ध कट केलाय असं त्याला वाटू लागलं. त्याने हेल्मेट भिरकावून दिलं, बाईकला एक लाथ मारली, बाईक खाली पडली. वैतागून तणतणत तो तळ्याकाठी जाऊन बसला. बसल्याबसल्या त्याने पाण्यात खडे टाकायला सुरुवात केली. पाण्यात असंख्य तरंग उठत होते तसेच त्याच्या मनातही असंख्य विचार येत होते. “काय आयुष्य आहे हे. सक्सेसफुल मोठा भाऊ असणं म्हणजे शापच आहे. आईचं त्याच्यावरच जास्त प्रेम आहे. त्याचाच तिला अभिमान वाटतो. नेहेमी कशी म्हणते, ‘ओजस कसा वाढला मला कळलं सुद्धा नाही, राजसने मात्र खूप त्रास दिला. जागरणं काय, आजारपणं काय....’ म्हणजे मी आजारी पडायचो हीसुद्धा माझीच चूक आहे!! सारखं आपलं ओजस, ओजस, ओजस, ओजस.... आणि आता तर कहरच. माझ्या गर्ल फ्रेन्डचा बाप सुद्धा ओजसला जाऊन विचारतो की मी त्याची लॉ फर्म जॉईन करणार का! अरे नाही करत जा.... त्याच्याशीच लग्न लाऊन दे तुझ्या मुलीचं...” वैतागून त्याने एक खडा तणतणून पाण्यात टाकला. तो पाण्यात पडतोय एवढ्यात अजून एक दगड पाण्यात खूप आत, दूरवर जाऊन पडला. हा कोणी टाकला म्हणून राजसने चमकून मागे बघितलं. त्याच्या मागे काही अंतरावर एक जण उभा होता. उंचपुरा, एखाद्या अॅथलीट सारख्या शारीर यष्टीचा, काळ्या सावळ्या रंगाचा तो मनुष्य हसत हसत पुढे आला. एवढ्या दुरून याचा दगड पाण्यात एवढ्या लांबवर कसा गेला असा आश्चर्याचा भाव राजसच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होता. “अरे मी रोजच दगड फेकत असतो. प्रॅक्टिस आहे मला” राजसच्या चेहऱ्यावरचं प्रश्न चिन्ह पाहून तो उत्तरला आणि येऊन राजसच्या बाजूला थोड्या अन्तरावर बसला.
“मी श्याम” त्याने हात मिळवण्यासाठी पुढे केला.
“मी राजस” राजासने हात मिळवला आणि खरं तर अनिच्छेनेच उत्तर दिलं. त्याला इथे ओळख वाढवून गप्पा मारत बसायची जराही इच्छा नव्हती.
“मग....” श्यामने प्रश्नार्थक नजरेने राजस कडे पाहात विचारलं.
“मग काय?” राजसने वैतागून विचारलं.
“अरे प्रॉब्लेम काय आहे?”
ह्याच्या आगाऊ पणावर चिडावं की हसावं राजसला कळेना. वरवर तो फक्त “कसला प्रॉब्लेम” एवढंच म्हणाला.
“तू तिथे हेल्मेट फेकलयस, बाईक पाडलीयेस आणि इथे एकटा पाण्यात खडे टाकत बसलायस. तुझा रोजचा कार्यक्रम हाच असेल असं तर वाटत नाही. काहीतरी बिनसलं असेल म्हणून इथे येऊन असा बसला असशील.” श्याम म्हणाला.
“असं काही नाहीये. रस्ता चुकलोय मी. आणि समजा असताही काही प्रॉब्लेम तरी मी तुला कशाला सांगेन?” राजसने विचारलं.
“अरे, ओळखीच्यांपेक्षा अनोळखी माणसाला प्रॉब्लेम सांगणं सोपं असतं. कारण ते आपल्याला judge करतील अशी धास्ती नसते. मन हलकं होतं आणि कधी कधी तटस्थ भूमिकेतून परिस्थिती पाहिली की ती जास्त व्यवस्थित समजते, अॅनलाइज करता येते, उपायही सापडतो.”
“तू काय सायकियाट्रिस्ट आहेस का?” राजसने विचारलं.
“नाही रे. माझा दुधाचा बिझनेस आहे. जवळच फार्म आहे माझं. माझं जाऊदे. तू बोल. मन मोकळं कर, तुला बरं वाटेल. मग मी तुला इथून बाहेर पडायचा रस्ताही दाखवतो.”
      भलताच आगाऊ आहे हा पण रस्ता माहितीये याला, आणि काय हरकत आहे बोलायला, राजस विचार करू लागला, साधारण ओजस च्याच वयाचा वाटतो. कदाचित थोडासा मोठा. आणि डोळे तर अगदी आईच्या सारखेच आहेत. आश्वासक, हा चांगला माणूस आहे असं सांगणारे. छ्याः आई आणि दादा कितीही दूर असले तरी आपल्या डोक्यातून जातच नाहीत. जाऊदे, बोलावं याच्याशी. नाहीतरी दुसरं काय काम आहे. बाईक बंद पडलीये. मदत तर हवीच आहे आपल्याला असा विचार करून राजसने बोलायला सुरुवात केली. “प्रॉब्लेम असा काही नाहीये. म्हणजे बाईक बंद पडलीये ते आहेच पण खरा त्रास वेगळाच आहे. आमच्या घरी मी, आई आणि दादा. मी जुनिअर कॉलेजला असताना बाबा गेले. मी लॉ करतोय. मोठा भाऊ ओजस माझ्यापेक्षा आठ वर्ष मोठा आहे. त्याची मोठी एस्टॅब्लिश्ड लॉ फर्म आहे. तो सगळ्या दृष्टीने चांगला, अगदी सरस आहे. लहानपणा पासूनच. शाळेत हुषार. कॉलेजमध्ये टॉपर आणि आतासुद्धा अगदी व्यवस्थित सेटल्ड! आणि मी आपला साधारण. सहाजिकच आईला तोच जास्त आवडतो. ती त्याचच सगळं ऐकते, त्याचीच बाजू घेते. मला हे असं सेकंड रहायचा अगदी कंटाळा येतो, वैताग येतो, संताप येतो....” राजसचा आवाज चढत गेला होता.
“असं आहे तर” श्याम लक्षपूर्वक ऐकत होता.
“ओजस खरच चांगला आहे. तसा मला आवडतो. तो जास्त हुषार आहे, मेहेनती आहे पण आईचं मुलांवरचं प्रेम हे irrespective ऑफ these things असलं पाहिजे ना! सारखी काय त्याचीच बाजू घ्यायची? तो जास्तच लाडका आहे तिचा” राजस निराश होऊन म्हणाला.
“बरेचदा काय होतं माहितीये राजस, आपण आईवडलांकडून परफेक्ट वागण्याची अपेक्षा करतो. आई म्हटलं की तिला न बोलता समजलं पाहिजे वगैरे. त्या घोळात आई, वडील हेसुद्धा हाडामासाची माणसंच आहेत हे आपण विसरतो. तू अजून लहान आहेस म्हणून तुला कळायला थोडं कठीण आहे. पण स्वतःला मुलं झाली की आपण त्यांच्या बाबतीत किती क्षमाशील असतो. त्यांच्या किती गोष्टी पोटात घालतो. वाईट वाटून घेत नाही, राग धरत नाही. पण तेच आपण, आपल्याशी अश्याच वागणार्या आईवडलांशी मात्र तसे वागत नाही. त्यांची प्रत्येक चूक, आपल्या दृष्टीने असलेली चूक आपण मनात धरून ठेवतो. आता तुझ्या बाबतीत म्हणायचं झालं तर दोन शक्यता आहेत. एक म्हणजे खरोखरीच तू म्हणतोस तसं तुझा भाऊ तुझ्या आईचा जास्त लाडका आहे आणि दुसरी शक्यता म्हणजे खरं तर असं नाहीये पण तुला असं वाटतंय”
“मला वाटतंय म्हणजे? मी काय वेडा आहे का उगीचच काहीही वाटून घ्यायला?” राजसने वैतागून विचारलं.
“तसं नाही रे मित्रा. आता बघ, जेवताना आई मोठ्या मुलाला दोन पोळ्या वाढते आणि छोट्याला एक. यात काही मोठ्यावर प्रेम जास्त आहे असं काही नसतं. त्यांची भूक जेवढी आहे असं तिला वाटतं त्याप्रमाणे ती देत असते. इक्वॅलिटी (सर्वांना सारखंच) आणि इक्विटी (सर्वांना पण प्रत्येकाला त्याच्या गरजेइतकं) असं कॉलेजमधे शिकल्याचं आठवतं का?” श्याम हसून पुढे बोलत राहिला, “आणि शिवाय यात ‘तिला वाटतं त्याप्रमाणे’ हेसुद्धा महत्वाचं आहे. ती तिच्या अंदाजाप्रमाणे हे आडाखे बांधत असते की याला कशाची किती गरज आहे आणि त्याला किती. पण मनुष्य म्हटला की अंदाज चुकण्याची शक्यता आहेच ना! पण या गोंधळात धाकट्याला असं वाटू शकतं की मला आई एकाच पोळी देते आणि दादाला दोन, दादा जास्त लाडका आहे.”
“तसं नाहीये रे” राजस आता अगदी मोकळेपणाने बोलू लागला होता, “आम्हाला दोघांनाही सर्व गोष्टी व्यवस्थित मिळतात. दादा तर स्वतःच कमावतो पण मलाही सगळं भरभरून मिळतं. प्रॉब्लेम गोष्टी मिळण्याचा नाहीये. आई त्याचंच सगळं ऐकते. तो म्हणेल ती पूर्व दिशा. आता बघ, त्याची लॉ फर्म आहे. तो कॉर्पोरेट लॉयर आहे. मला क्रिमिनल लॉ मधे इंटरेस्ट आहे. पण हा सांगतोय मला जॉईन हो. आईसुद्धा त्याचंच ऐकते आणि तेच सांगते. माझ्या म्हणण्याला कोणी भावच देत नाही. त्याच्या प्रत्येक म्हणण्याला करते तसा सपोर्ट तिने मला करावा, तसा रिसपेक्ट तिने मलासुद्धा द्यावा असं मला वाटतं आणि तो मला मिळत नाही, हा माझा प्रॉब्लेम आहे”
“हुषार आहेस तू. किमान आपला प्रॉब्लेम काय आहे हे तरी तुला नीट समजलंय. अनेकांचं आयुष्य जातं पण त्यांना स्वतःला काय हवय नि काय खुपतंय हेच त्यांचं त्यांना कळत नाही. पण मित्रा हे सपोर्ट आणि रिसपेक्ट जे म्हणालास ना त्या फार कठीण गोष्टी आहेत. मागून मिळत नाहीत. कमवाव्या, अर्न कराव्या लागतात.”
“कमवेनच रे मी. पंचविशीसुद्धा नाही झाली अजून माझी. पण तोपर्यंत? असाच भांडत राहू का सगळ्यांशी?” राजसने विचारलं.
“तो ढग बघ” श्यामने वर आभाळाकडे बोट केलं. राजसही वर बघू लागला. “समजा तू मुग्धाला भेटायला चालत निघालायस आणि असा मोठा काळा ढग आकाशात आला तर तू काय करशील?”
“मी जॅकेट किंवा छत्री घेईन.”
“का तू छत्रीने ढगाशी मारामारी करणार का?” श्यामने हसून विचारलं.
“काय रे तुला भेटलं नाही का कोणी सकाळपासून! ढगाशी मारामारी म्हणे! माझं डोकं भिजू नये म्हणून माझ्या डोक्यावर धरायला छत्री”
“तेच तर राजस!! बाकीचे आपल्याशी कसे वागतात, काय म्हणतात हे त्या काळ्या ढगासारखंच आहे. आपल्या नियंत्रणाबाहेर आहे. तो ढग, त्याला वाटलं तर बरसेल नाहीतर वार्याने दुसरीकडे कुठे जाईल आणि तिथे बरसेल. आपल्याकडे आपली छत्री हवी. आपली छत्री म्हणजे काय सांग?”
“काय”
“आपली छत्री म्हणजे आपला स्वतःवरचा ठाम विश्वास. तो असेल आणि प्रयत्न करण्याची तयारी असेल तर अशा पावसाचा मारासुद्धा तुझं डोकं भिजवू शकणार नाही. आईशी, भावाशी जरूर मोकळेपणाने बोल, तुला कसं वाटतं ते त्यांना मोकळेपणाने सांग, त्यांची बाजूसुद्धा समजून घे. नात्यांमध्ये मोकळेपणा, संवाद, सुसंवाद हवाच पण फक्त त्याने तुझा प्रश्न सुटेल अशी आशा मात्र ठेऊ नकोस. आपल्या बर्याच प्रश्नांचं मूळ हे आपल्या मनाच्या आतच असतं. म्हणून खरा संवाद हा आपला स्वतःचा स्वतःशीच असला पाहिजे. आईचा लाडका ही नंतरची गोष्ट झाली, तू स्वतः स्वतःचा लाडका आहेस का? असशील तर इतरांचा लाडका आहेस की नाही याने फारसा फरक पडता कामा नये. इतरांच्या बोलण्यामुळे तू स्वतः स्वतःवर शंका घेत नाहीयेस ना? सगळ्या कोलाहलात आपला आतला आवाज हरवूनच जातो. आपण स्वतःशी संवाद करतच नाही. तसा केलास तर तुला कळेल की आईची, भावाची पद्धत चुकीची असेलही, कदाचित त्यांचा सल्लाही चुकीचा असेल पण त्यांचा हेतू मात्र चांगलाच आहे, तुझं हित हाच आहे. तुझ्या ध्येयासाठी भरपूर प्रयत्न कर, यशस्वी हो पण त्यांना धडा शिकवण्यासाठी नाही तर तुझी तेव्हढी क्षमता आहे म्हणून. कारण राजस चुकीच्या पद्धतीने का होईना ते तुला मदत करण्याचाच प्रयत्न करताहेत.”
“हे असं इथे जंगलात तळ्याकाठी बसून असं बोलणं सोपं आहे. पण प्रत्यक्षात कोणी तुमच्या मनाविरुद्ध वागलं, राग येईल, वैताग येईल असं बोललं की हे छत्रीवालं तत्वज्ञान सुचत नाही.” राजस सहजा सहजी बधणार्यांतला नव्हता.
“सराव राजस, प्रॅक्टिस!! माझा खडा पाण्यात लांब का गेला? सराव.... जाणीवपूर्वक मनाला ताब्यात ठेवण्याचा सराव कर. राग करण्यात मनाची जी शक्ती वाया घालवतोस ती प्रयत्न करण्याकडे वळाव. Let your actions speak for you.
राजसने हसून मान डोलावली.
“चल रस्ता दाखवतो तुला” दोघे चालत बाईक कडे आले.
“अरे यार..... ही तर बंद पडली आहे” राजस आठवून म्हणाला.
“बघू, चावी दे”
राजसला आठवलं, वैतागून सगळी फेकाफेक करताना चावीसुद्धा फेकली असणार. तो जमिनीवर पाल्यापाचोळ्यात चावी पडलीये का बघू लागला.
“पुन्हा तेच, सगळा शोध बाहेर! आत बघ!! सगळी फेकाफेक करण्या आधी तू सवयीने चावी जीन्सच्या खिशातच टाकली होतीस ना?”
राजसने बघितलं तर खरच चावी खिशातच टाकली होती की! हायसं वाटून त्याने चावी श्यामला दिली. श्यामने एक किक मारली आणि बाईक चालूही झाली.
“भारीच टेम्परामेन्टल झालीये ही” राजस उद्गारला.
“तुझीच बाईक!” श्यामने हसून म्हटलं, “ऐक, ते समोर मोठ्ठं झाड दिसतंय ना तिथून डावीकडे वळलास की कच्चा रस्ता लागेल. त्यावर साधारण पाच मिनिटं गेलास की पक्का रस्ता दिसेल. त्यावर उजवीकडे वळ की तुझ्या शहराकडे जाशील.
“तुला सोडू तुझ्या फार्मवर?”
“तू हो पुढे. मी थोडा वेळ थांबणार आहे” म्हणून श्यामने राजसच्या खांद्यावर थाप दिली.
“थॅंक्स श्याम, बरं वाटलं तुझ्याशी बोलून.”
“काळे ढग आले तर लक्षात ठेवशील ना?” श्यामने हसून विचारलं.
“नक्की!!” राजस हसून उत्तरला. दोघांनी हात मिळवले आणि राजस निघाला.

सकाळी चिडून निघून गेलेला राजस संध्याकाळ झाली तरी आला नव्हता. त्याच्या आईच्या डोळ्यांना धार लागली होती. देवघरासमोर बसून ती माऊली मनोमन आळवत होती, “कृष्णा, तुला देवकीचं प्रेम कळलं आणि यशोदेचंही. माझ्या बाळाला मात्र माझं प्रेम कळत नाहीये रे. त्याची काळजी घे. त्याला सुखरूप घरी आण”

राजस निघाला. त्याने वळण घेतलं. समोर खरंच डांबरी रस्ता होता आणि त्याच्या शहराच्या दिशेने जाणारी पाटी. श्यामने बरोबर रस्ता सांगितला होता तर... आईबद्दलही तो बरोबर म्हणाला. तिचं थोडसं चुकत असलं तरी तिचं प्रेम सारखंच आहे दोघांवर. मी नेहेमी उलटं धरून चालतो म्हणून.... मुग्धासुद्धा तेच म्हणते. आणि काय म्हणाला तो, मुग्धाला भेटायला जायचं असेल आणि काळा ढग आला तर..... wait a minute.... मुग्धाबद्दल तर मी त्याला काही म्हटलंच नाही. मुग्धाचं नाव त्याला कसं कळलं! आणि चावी... चावी मी ठेवताना तर तो तिथे नव्हताच. त्याला कसं कळलं! कसं कळलं !! राजस चांगलाच गोंधळला. श्यामला शोधायला त्याने बाईक मागे वळवली. तो पुन्हा तळ्याकाठी आला. पण श्याम दिसला नाही. ते बसले होते त्या जागी एक मोरपीस मात्र होतं.

डॉ. माधुरी ठाकुर